साई कुठे दिसेनाशी झाल्याने श्रीनिवास हे घाबरले होते. त्यांना वाटलं होतं की त्यांची पत्नी बहुधा समुद्रात बुडाली असावी. त्यांनी थेट पोलिसांत धाव घेत त्यांना जे वाटलं ते सांगितलं. पोलिसांनी त्यांच्या निवेदनावरून साई बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवत तिच्या शोधाचे प्रयत्न सुरू केले होते.श्रीनिवास याने पोलिसांना सांगितलं होतं की साई समुद्राच्या पाण्यात पाय धुवायला गेली होती. त्यानंतर ती त्यांना दिसलीच नाही. दोन दिवस श्रीनिवास यांनी साईचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना ती सापडली नाही.
इकडे श्रीनिवास भयंकर टेन्शनमध्ये असताना दुसरीकडे साईच्या घरच्यांना एक व्हॉटसअप मेसेज आला होता. या व्हॉईस मेसेजमधला आवाज हा साईचा असल्याचं तिच्या घरच्यांना लगेच कळालं होतं. या व्हॉईस मेसेजमध्ये साईने आपण जिवंत असल्याचं सांगितल्यानंतर त्यांचा जीव भांड्यात पडला होता. मात्र त्यानंतर साईने जे सांगितलं ते ऐकून त्यांना धक्का बसला. साई म्हणाली की 'मी साई प्रिया बोलतेय, मी जिवंत आहे आणि रवीसोबत आनंदात आहे. आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करतो, आम्ही लग्नही केलंय, आमची काळजी करू नका, शोधण्याचा प्रयत्नही करू नका, मी पळून-पळून थकले आहे, तुम्ही जास्त दबाव टाकलात तर मी स्वत:चं बरंवाईट करेन. मला पोलीस आणि प्रशासनाची माफी मागायची आहे. रवीच्या कुटुंबाला त्रास देऊ नका, यात त्यांचा काहीही दोष नाही' हा मेसेज मिळताच साईच्या घरच्यांनी पोलिसांना याबाबतची कल्पना दिली. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या थ्री टाऊन पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामा राव यांनी सांगितले की श्रीनिवास आणि प्रिया यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र साई लग्नापासून खूश नव्हती. लग्नानंतरही तिचा जीव तिचा प्रियकर रवी याच्यात गुंतला होता.