लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळावा; राष्ट्रपतीकडे रुग्ण हक्क परिषदेचे १० हजार पत्रांचे अभियान

लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळावा; राष्ट्रपतीकडे रुग्ण हक्क परिषदेचे १० हजार पत्रांचे अभियान
पुणे, १ ऑगस्ट २०२५:* लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना भारतरत्न किताब मिळालाच पाहिजे, या मागणीसाठी रुग्ण हक्क परिषदेने राष्ट्रपतींना १० हजार पत्र पाठवण्याचा संकल्प केला. या अभियानाची सुरुवात पुण्यातील सारसबाग समोरील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी अपर्णा साठ्ये, अनिल हातागळे, यशवंत भोसले, अमृता जाधव आणि गायक अमर पुणेकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. अण्णाभाऊंच्या सामाजिक आणि साहित्यिक योगदानाला मानवंदना देत हे अभियान समाजात प्रेरणा निर्माण करेल, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना लवकरात लवकर भारतरत्न किताब मिळेल, अशी अपेक्षा परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी व्यक्त केली.
       अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याने दलित आणि कष्टकरी समाजाला आवाज दिला, असे उमेश चव्हाण यांनी सांगितले. त्यांच्या साहित्यातून सामाजिक समता आणि बंधुभावाचा संदेश मिळतो, जो आजही प्रासंगिक आहे. या अभियानातून परिषदेने तरुण पिढीला अण्णाभाऊंच्या विचारांशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. कार्यकर्त्यांनी पत्रलेखन मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पुढील आठवड्यात पुणे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ही पत्रे राष्ट्रपती भवनात पाठवली जाणार आहेत. हे अभियान अण्णाभाऊंच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे ठरेल, असे परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post