पंढरपूर, दि. 21 जुलै : आषाढी यात्रा 2026 च्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगरपरिषदेने वारकरी, भाविक आणि यात्रेकरूंना स्वच्छता, सुरक्षितता व सार्वजनिक आरोग्य जपण्यासाठी महत्त्वाचे आवाहन केले आहे.
नगरपरिषदेकडून जारी करण्यात आलेल्या सूचनांनुसार भाविकांनी अधिकृत निवासस्थानीच मुक्काम करावा. उघड्यावर मिळणारे अन्न टाळून केवळ स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा वापर करावा. ओला व सुका कचरा वेगळा ठेवून तो कचरापेटीतच टाकावा तसेच सार्वजनिक शौचालयांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय, प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे, तसेच पोलिस, स्वयंसेवक आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. कोणतीही अडचण निर्माण झाल्यास तात्काळ प्रशासन किंवा जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.
आषाढी यात्रेदरम्यान वाहनांच्या पार्किंगसाठी शहरातील विविध ठिकाणी विशेष व्यवस्था करण्यात आल्याची माहितीही नगरपरिषदेने दिली आहे.
"स्वच्छ पंढरी, सुंदर पंढरी" हा संदेश देत पंढरपूर नगरपरिषदेने सर्व भाविकांनी सहकार्य करून आषाढी यात्रा स्वच्छ, सुरक्षित आणि आनंददायी करण्याचे आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment