अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनातर्फे सर्वोतोपरी मदत- पालकमंत्री जयकुमार गोरे

Maharastra now 24
0

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनातर्फे सर्वोतोपरी मदत- पालकमंत्री जयकुमार गोरे

   


            पंढरपूर-अतिवृष्टीमुळे सांगोला तालुक्यातील मंडळाच्या ६ मंडळातील गावांमध्ये शेतपीक, फळपीक, बंधारे, रस्ते, घरे, पुलांचे नुकसान झाले आहे. आपत्तीच्या काळात शासन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून नुकसानीच्या मदतीपासून एकही नागरिक वंचित राहणार नाही. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनातर्फे सर्वोतोपरी मदत दिली जाईल अशी ग्वाही ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.


अतिवृष्टीमुळे सांगोला तालुक्यातील महिम, येथील वाहून गेलेल्या पुलाची, तसेच महूद वाकीशिवणे,कडलास येथील घरे, शेतीचे झालेल्या नुकसानीची पालकमंत्री श्री. गोरे यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.  


यावेळी त्यांच्या समवेत आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजी बापू पाटील, माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम,प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार संतोष कणसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, उपविभागीय कृषी अधिकारी लांडगे, गटविकास अधिकारी उमेश कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव उपस्थित होते.


यावेळी पालकमंत्री गोरे म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतपिकांचे, घरांचे तसेच सार्वजनिक मालमत्तांचे तात्काळ पंचनामे करून अहवाल शासनास सादर करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या आहेत.


महिम येथे अतिवृष्टी झाल्याने दोन मुले वाहून गेली होती. त्या ऐवळे कुटुंबीयांना आवश्यक ती मदत करण्यात येईल. महिम येथे अरुंद पूल असून मुलाच्या रुंदीकरणाचे काम संबंधित विभागाने तात्काळ करावे. कडलास येथे ढगफुटी झाल्याने कोळी बांधवांच्या राहत्या घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले असून ज्यांना आवास योजनेतून घरकुल मंजूर झाले आहेत त्यांची कामे तात्काळ सुरू करावी तसेच ज्यांना जागा उपलब्ध नाहीत त्यांना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना ही यावेळी त्यांनी दिल्या.


अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करताना पालकमंत्री गोरे यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी, गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना धीर दिला. तसेच शासन पूर्णपणे आपल्या पाठीशी असून शासनतर्फे नुकसानी संदर्भात लवकरच मदत दिली जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments

Post a Comment (0)